अनवर्दे खुर्द येथे गोठ्याला भीषण आग; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
अनवर्दे खुर्द:
येथील रहिवासी श्री. गजानन गुपचंद शिरसाट यांच्या मालकीच्या गोठ्याला आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत गोठ्यातील गुरांचा चारा आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, यात साधारण १ ते दीड लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ग्रामस्थांची धाव आणि समयसुचकता
सायंकाळी अचानक लागलेली आग एवढी भयंकर होती की, आगीच्या ज्वालांनी काही वेळातच संपूर्ण गोठ्याला विळखा घातला. सुदैवाने यावेळी वीज पुरवठा सुरू असल्याने गावातील कूपनलिका (ट्युबवेल) सुरू करून संपूर्ण गावाने एकत्र येत आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
अग्निशामक दलामुळे आग आटोक्यात
आगीचे गांभीर्य ओळखून गावातील सामाजिक कार्यकर्ते महेश बोरसे यांनी तातडीने पोलीस स्टेशन आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधला. बोरसे यांच्या समयसुचकतेमुळे अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी वेळेत दाखल झाली. अग्निशामक जवान आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
ग्रामस्थांचे कौतुक:
आग लागल्याचे समजताच जात-पात, हेवेदावे बाजूला ठेवून संपूर्ण गावाने संकटसमयी धाव घेतली. गावातील प्रत्येकाने आग विझवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी गजानन शिरसाट यांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
0 टिप्पण्या